Thursday, July 2, 2009

आषाढी एकादशीच्या शुभेच्छा




विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला

वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला.....


देवा पांडुरंगा,


पाऊस दे रे बाबा महाराष्ट्राला.


भाताच्या पेरण्या केलेत .............. शेतात पाणी दे रे बाबा


अंगणातली फुलझाडं सुकून गेलेत


ती पुन्हा टवटवीत कर रे बाबा.........


लहान लहान चिमुरड्या घागरी घेऊन पाण्यासाठी वणवण करत आहेत


त्यांची वणवण थांबव रे बाबा.....


महाराष्ट्रातल्या सर्व नद्या तलाव भरून टाक रे बाबा.......


हे साकडं घातलयं तुला उभ्या महाराष्ट्राच्या वतीनं, त्याची जाण ठेवून काही कर रे बाबा.......

मागे बहुतांचे फेडियले ऋण...
आम्हांसाठी कोण आली धाड?


तुझा,
(हवालदिल) धोंडोपंत

Wednesday, July 1, 2009

एका सेकंदात भविष्यकथन --- भाग २

लोकहो,

नंबरावरून भविष्यकथनाची काही उदाहरणे मागच्या लेखात दिली होती. त्याचा हा पुढील भागः

५) सातार्‍याचे श्री. मारूतीशेठ साबळे यांचा फोन आला. "पंत, तुम्हाला भेटायचे आहे, आज मुंबईत आलोय कामासाठी. संध्याकाळी परत चाललोय. कधी येऊ?"

आम्ही नेमके त्या दिवशी एका लग्नासाठी पार्ल्यात होतो. प्रश्न काय आहे विचारले, तेव्हा मारूतीशेठने, " तीन मुर्रा म्हशी घ्यायच्या आहेत. घेऊ का नको?" असे विचारले.

एक मुर्रा म्हैस पोसायची म्हणजे किती खर्चाचे काम आहे, हे ज्यांना त्यातली माहिती आहे त्यांनाच कळेल. सोप्या शब्दांत सांगायचे तर, एखादी मर्सडिज गाडी ठेवणे परवडेल, पण ही म्हैस नको, अशी स्थिती आहे. उगीच नाही दहा बारा लिटर दूध एका वेळेस देत. तिची काळजी पण तशीच घ्यायला लागते.

आम्ही मारूतीशेठना नंबर द्यायला सांगितले. त्यांनी नंबर दिला ११६.

"बिनधास्त घ्या, म्हशींकडून फायदा होईल. दुधाचे पाट वाहतील, खरवस पाठवून द्या आम्हाला. पण सौद्यात मात्र जपा." असे सांगितले.

याचे कारण ६ व्या स्थानावरून पाळीव प्राणी, दुभती जनावरे पाहिली जातात आणि अकरावे स्थान हे इच्छापूर्तीचे आहे. पण या नंबराची बेरीज ८ येते.

मारूतीशेठने हरयाणाला जाऊन म्हशी आणल्या पण त्या सरदारजीने त्यांना सौद्यात जवळजवळ दहा हजाराला टोपी घातलीच.

**********************************************************

६) युनिव्हर्सिटीच्या इंटर कॉलेज क्रिकेट टूर्नामेंट चालू असतांना आमच्याच गल्लीत राहणार्‍या एका मुलाने, " काका, आज तरी माझी सेंच्युरी होईल का?" असा प्रश्न कळवळून विचारला. त्यासाठी त्याने नंबर दिला १४६.

तो त्याच्या टीमचा ओपनर होता आणि आधीच्या दोन्ही मॅचमध्ये भोपळाही न फोडता आउट झाला होता.

आम्ही त्याला "आज तुझी सेंच्युरी होईल आणि तुझी टीम मॅच जिंकेल" असे सांगितले. १४६ मधील ४ व ६ हे अंक पाहून "आज तू फोर आणि सिक्सचा पाऊस पाडशील" असेही म्हणालो.

आणि झालेही तसेच. त्याची सेंच्युरी झाली आणि टीमने ती मॅच जिंकली.

त्याने एकूण दहा सिक्स मारल्या पण त्यातील एक सिक्स वादग्रस्त असल्यामुळे ती सिक्स न देता फोर देण्यात आली. त्यामुळे एकूण ९ सिक्स त्याच्या खात्यावर जमा झाल्या.

६ हा अंक प्रतिस्पर्ध्यावर विजय दाखवतो तसेच बेरीज ११ येतेय ती इच्छापूर्ती दाखवते.

***********************************************************

७) एका लेखिका बाईंनी एका साहित्यसंघाद्वारे भरविण्यात आलेल्या कथास्पर्धेत त्यांची कथा पाठवली होती. शिवाजी पार्कात फिरायला गेलो असतांना त्या भेटल्या. दोन साहित्यिक भेटले की नवीन काय लिहिलाय याबद्दल चर्चा होते.

त्या भेटल्यावर आमच्या "मॉर्निंग वॉक"च्या पुढील राऊंड बोंबलल्यात, हे आमच्या लक्षात आले. आम्ही त्यांच्याबरोबर प्रकाश हॉटेलमध्ये गेलो आणि बोलताबोलता त्यांनी

" पंत, मी पाठवलेल्या कथेला स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कथेचे पारितोषिक मिळेल का?" असे विचारले. त्यासाठी त्यांनी ३७ नंबर दिला.

आम्ही विचारले, " तुम्ही लिहिलेली कथा ही कौटुंबिक आहे का? म्हणजे पती-पत्नी संबंध, घरातल्या वैवाहिक समस्या, जोडीदाराचे विवाहबाह्य संबंध... वगैरे विषय आहे का?"

"बरोब्बर. पण हे तुम्हाला कसं कळलं?"

म्हटलं, " ते जाऊ दे. तुमच्या कथेला पारितोषिक मिळेल."

त्यांच्या त्या कथेला सर्वोत्कृष्ट कथेचे पारितोषिक मिळाले. तृतीय स्थान हे लेखनाचे स्थान आहे. सप्तमस्थान हे वैवाहिक जोडिदाराचे व कौटुंबिक बाबींचे. म्हणून कौटुंबिक कथा आहे का? असे विचारले होते.

दशमावरून मानमरातब कळतो.

*****************************************************

८) पनवेलला एसटी स्टँड समोरील निमकरांच्या विसावा हॉटेलात मिसळपाव खात असतांना श्री. म्हात्रे तेथे आले. म्हात्रे खोपोलीला एका रसायनाचे उत्पादन करण्यार्‍या कंपनीत फोरमन होते.

त्यांनी प्रश्न विचारला की," पंत, कंपनीत व्हीआरएस येतेय. घेऊ का मी?" त्यासाठी त्यांनी ६५ नंबर दिला.

" लगेच आजच जाऊन अर्ज भरा" असे सांगितले. ६ च्या पुढे ५ म्हणजे कंपनीचे आणि पर्यायाने यांच्या नोकरीचे काही खरे नाही. त्यामुळे जे मिळताय ते पदरात पाडून घ्या असे म्हात्रे यांना सांगितले.

म्हात्रेंनी अर्ज भरला. घसघशीत रककम कॉम्पेनसेशन म्हणून मिळाली. गेल्या दोन वर्षात त्या कंपनीचे दिवाळे निघाले आणि लोकांचे पगारही लटकले आहेत.

कंपनीचे डायरेक्टर आणि त्यांची उनाड मुले मात्र अजून आलिशान गाड्या घेऊन फिरत आहेत. कामगारांचे पगार मात्र अडकलेत.

खोपोलीत रोज रसायनाचा धूर ओकणारी त्या कंपनीची चिमणी आता कायमची थंडावली आहे.

बरं झालं म्हात्रे त्या दिवशी पनवेलला भेटले. नाहीतर ते ही लटकले असते.

******************************************************

उर्वरीत पुढील भागात....

आपला,
(आश्वासक) धोंडोपंत

एका सेकंदात भविष्यकथन.....

लोकहो,

प्रश्नकुंडलीसाठी कृष्णमूर्ती आणि भाव-नवमांश पद्धतीत जातकाकडून एक नंबर घेऊन त्यावरून त्याच्या प्रश्नाचे उत्तर दिले जाते हे आपण जाणताच. पारंपारिक ज्योतिषात प्रश्न नंबरावरून पाहिला जात नाही.

पारंपारिक ज्योतिषात जातक कुठल्या होर्‍यावर प्रश्न विचारतोय, तो कसा बसला आहे, मान वर करून बसला आहे की खाली वगैरे गोष्टी पाहिल्या जातात. हे सर्व भाकड आहे त्यात काडीचेही तथ्य नाही, असे आमचे मत आहे.

पारंपारिक ज्योतिषांनी आमच्या या विधानाबद्दल आम्हाला शिव्या देण्यापूर्वी यातील किती गोष्टी प्रश्नकुंडलीचे उत्तर देतांना अनुभवास येतात? हे अंतर्मुख होऊन पहावे आणि मग आमच्या नावाने शंख करावा. असो.

अनुभव असा येतो की, जातक जो नंबर देतो तो नंबर त्याचे भविष्य सांगत असतो. याचा अर्थ प्रश्नकुंडली न बनवता केवळ नंबरावरून उत्तर द्यावे, असा नव्हे. सूतावरून स्वर्ग कुणी गाठू नये.

प्रश्नकुंडली बनवायलाच हवी. पण ती बनविण्यापूर्वी तो नंबरही बरेच काही सांगत असतो. त्याचे अवलोकन आणि पुढे कुंडलीवरून काढलेले निष्कर्ष पडताळून पाहिल्यावर असे आढळून येते की नंबराने जे सांगितले ते कुंडली सांगत असते. नंबर हा शॉर्टकट आहे. त्यावर अवलंबून राहू नये हे पुन्हा एकदा सांगतोय. काही वेळा विविध कारणांमुळे प्रश्नकुंडली मांडणे शक्यही नसते. कधी आपण प्रवासात असतो, कधी आवश्यक ती साधनसामग्री जवळ उपलब्ध नसते, कधी जातकाचा प्रश्न फारसा गंभीर नसतो. अशा वेळेसही नंबरांवरून उत्तम भाकीत करता येते.

या नंबराच्या अंकशास्त्रीय किमयांबद्दल आमचे विद्वान ज्योतिर्विद स्नेही श्री. विजय हजारी यांनी मोलाचे संशोधन केले आहे. एखादा नंबर वारंवार एकाच स्वरूपाचे होकारात्मक किंवा नकारात्मक उत्तर देतो हे डोळे उघडे असतील आणि डोकं शाबूत असेल तर हमखास अनुभवास येते.

प्रश्नपरत्वे फलाच्या अनुभूतीत वैचित्र्य आढळले तरी एक सर्वसमावेशक तत्त्व प्रत्येक अंकात आहे हे निर्विवादपणे आम्हाला अनुभवायला आले आहे. त्याबद्दलची काही गमतीदार उदाहरणे पुढील दोन तीन लेखात देत आहोत.

१) पनवेलहून दादरला येत असता वाशीच्या इंजिनियरिंग कॉलेजात शिकणारा दादरचा एक मुलगा एसटी मध्ये चढला. तो ही घरी परतत होता.

गप्पांच्या ओघात त्यांने त्याचे एका मुलीवर प्रेम आहे आणि पुढे काय होईल ते सांगा असे म्हणत, स्वतःच ५८ नंबर दिला.

आम्ही नंबर पाहून "तुझ्या या प्रेमप्रकरणाचे तीन तेरा वाजतील" असे सांगितले. पंचम हे प्रेम आणि प्रणयाचे स्थान आहे. अष्टम हे मनस्ताप, नुकसान हानी दाखवते. तसेच याची बेरीज १३ येते म्हणून तीन तेरा वाजतील असे सांगितले.

काही दिवसात तो " ते सर्व संपलं" असे सांगायला आला.

***** ***** *****

२) सौभाग्यवतींच्या ऑफिसमधील आधीचा बॉस अत्यंत विचित्र माणूस होता. स्टाफच्या मागे सारखी किटकीट करायचा. प्रत्येकाला, " तुम्ही काय करताय, तुम्ही काय करताय?" विचारत बसायचा. त्यामुळे संपूर्ण ऑफिसात त्याच्याबद्दल प्रत्येकाच्या मनात राग होता.

एक दिवस लंच टाईम मध्ये सौभाग्यवतींच्या मैत्रिणीने म्हटले की, " संध्या, तुझ्या मिस्टरांना विचार गं, हा गोंद्या इथून जाईल की नाही ते. नाहीतर आपण रिटायर होईपर्यंत हा इथेच" .

त्या साहेबांना सर्व जण "गोंद्या" म्हणायचे. सौ. ने आम्हाला फोन केला. आम्ही मैत्रिणीकडून नंबर द्यायला सांगितले. मैत्रिणीने ७९ नंबर दिला.

सात हा अंक समोरची व्यक्ती दाखवतो. नवम स्थान हे सप्तमाचे तृतीय स्थान आहे. म्हणजे समोरच्या माणसाच्या बदलीचे. त्यावरून बॉसची ट्रान्सफर अटळ आहे असे सांगितले.

सौ. ने आमचे उत्तर मैत्रिणींना सांगताच त्यांच्या लंच ग्रुप मधल्या सर्व मैत्रीणींनी कॅन्टीनमध्ये जल्लोष केला. तो आवाज आम्हाला फोनवर ऐकू येत होता.

लगेच दुसर्‍या एका मैत्रिणीने सौ. ना सांगितले की, " पण तो कधी जाईल हे ही विचारून घे".

सौ. ने आम्हाला विचारले की, "बदली होईल पण कधी?"

क्षणाचाही विलंब न लावता आम्ही म्हटले, " अजून तीन महिन्यांनी ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात".

७९ नंबरचा सब कर्केत आश्लेषा नक्षत्रात येतो. रवी आश्लेषा नक्षत्रातून २ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट रोजी भ्रमण करतो. म्हणून ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात बदली होईल असे उत्तर दिले.

त्याप्रमाणे गेल्यावर्षी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात "गोंद्या"ची बदली सांताक्रूज वरून बोरिवलीला झाली. सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.


गोंद्या गेला रे गेला !!!

********* ********** ********

३) ओएनजीची मध्ये काम करणार्‍या एका वरिष्ठ अभियंत्याची बदली सिलचर, आसाम येथे झाली होती. तिथून काहीही करून त्याला परत यायचे होते. बायको मुलगा मुंबईत आणि हा आसाममध्ये अशी स्थिती होती.

त्याने ३३ नंबर दिला आणि बदली होईल का असे विचारले. आम्ही त्याला, " एकदा काय दोनदा बदली होईल असे सांगितले."

३ हा नंबर बदली दाखवणारा आहे. तो दोनदा आला आहे. इतकेच नव्हे तर प्रश्नवेळी मिथुन लग्न सुरू होते. चंद्रही कन्येत होता. म्हणून दोनदा बदली होईल असे सांगितले.

तो म्हणाला, " अहो पंत, अशी दोनदा बदली होत नाही. एकदा झाली तरी खूप'.

आम्ही त्याला " बघूया.... समजेलच काय होताय ते" असे म्हणालो.

त्यानंतर तीन आठवड्यात त्याची बदली गुजरातमध्ये अंकलेश्वर येथे झाली. त्याचवेळी ओएनजीसीच्या बॉम्बे हाय च्या ऑफशोअर साईटवर काही नवीन तंत्रप्रणालीचे काम सुरू होणार होते. त्यासाठी अनुभवी आणि हुशार माणसे निवडण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यात याचे नाव गेले आणि महिन्याभरात अंकलेश्वरवरून मुंबईत आला.

३३ ने दोन बदल्या केल्या.

********** ********** ************

४) एकदा गुहागरहून परत येत असतांना संध्याकाळी "पाटपन्हाळे" गावात शिरल्यावर वेदशास्त्रसंपन्न श्री. महादेवशास्त्री फडके गुरूजी रस्त्यात दिसले. लगेच गाडी थांबवून खाली उतरून त्यांना वाकून नमस्कार केला.

श्री. फडकेशास्त्रींनी आशीर्वाद देत, " पंत, आमचा नातू अमेरिकेत जाईल काय शिकायला?" असा प्रश्न विचारला. त्यासाठी ९९ नंबर दिला.

नवमस्थानावरून संततीची संतती म्हणजे नातवंडे पाहिली जातात. त्यांचा प्रश्न नातवंडांबद्दलच होता आणि नवम स्थानावरून उच्चशिक्षण आणि परदेशगमनही पाहिले जाते.

म्हटलं, " शास्त्रीबुवा, तुमचा नातू उच्चशिक्षणासाठी नक्की परदेशात जाईल. काही काळजी नको. "

"तो प्रयत्न करतोय हो. पण अजून त्याला त्यात यश आलेले नाही म्हणून विचारले." इति शास्त्रीबुवा

" सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात जाईल." असे सांगितले आणि शास्त्रीबुवांचे वेदोक्त आशीर्वाद घेऊन मुंबईत परतलो.

त्यानुसार पुढे चिरंजीव संकल्प फडके, सप्टेंबरात अमेरिकेला उच्चशिक्षणासाठी रवाना झाले.

*********** *********** **************

नंबरांविषयी बरेच किस्से आहेत. सर्व लिहिले तर १५/२० लेख होतील. जेवढे जमेल तेवढे दोन तीन भागात लिहू.

आपला,
(नंबरी) धोंडोपंत

Saturday, June 27, 2009

मेघांची दाटी गगनी, तू अंत नको पाहूस

लोकहो,

काल संध्याकाळी श्री दत्त ज्योतिष विद्यालयाची कृष्णमूर्ती आणि भाव नवमांश पद्धतीची नवीन बॅच शारदाश्रम विद्यामंदीर दादर येथे सुरू झाली. श्री. विजय हजारी यांचे व्याखान सुरू व्हायची वेळ झाली होती. श्री हजारी सरांबरोबर आम्ही कॉरिडॉरमध्ये गप्पा मारत असतांना दिवसभर दडी मारून बसलेल्या पावसाच्या आगमनाची चाहूल लागली. मिनिटभरात आभाळात काळोख दाटून आला.

पाऊस आणि मित्रवर्य ग्रेस यांच्या कविता यांचे नाते अतूट आहे. आम्ही तिथूनच ग्रेसना नागपूरला फोन लावला. म्हटलं, "

पाउस आला, पाउस आला, गारांचा वर्षाव
गुरे अडकली रानामध्ये दयाघना तू धाव.....


ग्रेस तेथून ओरडले, "वा वा, काय आठवण करून दिलीत?"

दहा मिनिटे इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. मुंबईत आल्यावर सकाळी आमच्या नेहमीच्या इराण्याच्या हॉटेलातील ऑम्लेट पावाचे आमंत्रण दिले. ग्रेसशी बोलत असतांना एक ओळ सारखी डोक्यात पिंगा घालत होती.

मेघांची दाटी गगनी, तू अंत नको पाहूस......

दर मिनिटाला तीच ओळ गुंजारव केल्यासारखी समोर येत होती. ग्रेसचा फोन ठेवला आणि चार ओळी लिहून झाल्यात. आम्हाला त्या अतिशय आवडल्या आहेत. तुम्हाला आवडतात का बघा. कविता पूर्ण झाल्यावर ती ही आस्वादासाठी प्रसिद्ध करू.

मेघांची दाटी गगनी
तू अंत नको पाहूस

क्षण दोन क्षणांची खोटी
बरसेल अता पाऊस....

चल वेचू क्षण हे सखये
ये निघून लवकर आता
मी शब्द उधळतो आहे
दे सूर तुझे या गीता...


आपला,
(विरहव्याकूळ) धोंडोपंत

Friday, June 26, 2009

धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना....शब्दरूप आले, मुक्या भावनांना


लोकहो,

दिनांक १६ जून रोजी सकाळी भल्या पहाटे म्हणजे सकाळी ८.३० वाजता आयसीआयसीआय बँकेच्या दादर टीटीच्या शाखेत गेलो होतो. दादर टीटी ला गेल्यावर रुईया नाक्यावर जायचे नाही, म्हणजे आग्र्याला जाऊन ताजमहाल न पहाण्यासारखे आहे. त्यामुळे बँकेचे काम आटोपल्यावर रुईया नाक्यावर चक्कर टाकायची, जुन्या स्मृतींना (आणि सुगंधी जखमांना) जरा उजाळा द्यायचा, नेहमीच्या दुर्गा-परमेश्वरी हॉटेलात इडली वडा, कॉफी असा बेत करून घरी जाऊन कामाला सुरूवात करायची अशी योजना होती.

त्यानुसार दुर्गा-परमेश्वरीत बसलो असतांना पोदार कॉलेजमधील प्रणव नावाचा प्रणयवीर आम्हाला तिथे भेटला. या प्रणवची प्रश्नकुंडली आम्ही महिन्याभरापूर्वी बनवली होती. प्रश्न नेहमीचाच होता.

"ती" मला "हो" म्हणेल का?.... आता खरे तर हा जनरल प्रश्न आहे. पण तो युनिव्हर्सलही आहे. असो.


त्याचे पोदारमधीलच एका मुलीवर प्रेम आहे. ते अजूनपर्यंत एकतर्फी असावं. पण ती सुद्धा त्याच्यात "इंटरेस्टेड" आहे असे त्याचे मत आहे. पण ते जागतिक सत्य नसावं. कारण प्रणव जेव्हा आला होता तेव्हा त्याने "ती मला होकार देऊन माझे तिच्याशी लग्न होईल का?" असा प्रश्न विचारला होता. सहाजिकच प्रश्न विचारण्याच्या क्षणापर्यंत तिचा होकार आलेला नव्हता हे सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ आहे.

आम्ही तेव्हा प्रश्नकुंडली बनवून "ती तुला नक्की होकार देईल, अजिबात काळजी करू नकोस" असे त्याला सांगितले होते. तो खूश होऊन आमच्याकडून गेला होता. ती किती चांगली आहे वगैरे बर्‍याच अनावश्यक गोष्टीही आम्हाला त्याने सांगितल्या होत्या.

दिनांक १६ जूनला आम्हाला डीपीत (दुर्गा-परमेश्वरी) पाहिल्यावर "गुड मॉर्निंग पंत" म्हणत तो समोर येऊन बसला.

म्हटलं, "गुड मॉर्निंग प्रणव. बैस. तिची वाट पहातो आहेस की काय?"

"नाही हो. कसलं काय?"

आम्हाला धक्काच बसला. आमच्या अंदाजाने तिचा होकार यायला पाहिजे होता. आणि हा म्हणतो कसलं काय?

म्हणून त्याला चौकसपणे विचारले की नक्की काय झालाय. तेव्हा तो म्हणाला की, " पंत, तुम्ही कुंडलीवरून सांगितले होतेत की ती नक्की होकार देईल म्हणून"

"होय. मग?"

"म्हणून मी तिला प्रपोज केलं."

"पुढे"

"पण अजून काही तिच्याकडून होकार आलेला नाही."

"नकार आला का?"

"तो नाही आला हो. पण मी तिला पहिल्यांदा प्रपोज केलं. ते तिने सर्व ऐकून घेतलं. इथेच बसलो होतो आम्ही डिपीत... त्या टेबलावर" असे म्हणत त्याने कोपर्‍यातल्या टेबलाकडे बोट दाखवले.

"पण तिने काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स नाही दिला. आम्ही गप्पा मारल्या नेहमीप्रमाणे. जातांना तिला परत विचारलं की What you have to say about it ? तर नुसतीच हसून म्हणाली " I will let you know". बाकी काही नाही."

आम्ही त्याला म्हटले की, " या डिपीत अनेकांची प्रेमप्रकरणे जुळली आहेत. आणि विशेषत: ते कोपर्‍यातलं टेबल आहे ना, जिथे तुम्ही बसला होतात, ते खूप लकी आहे. आता पहा ते दोघे बसलेत तिथे..... ती पटणार त्याला. कारण ते टेबलच लकी आहे."

आमच्या बोलण्यावर तो खळखळून हसला. म्हटलं, " तिने नकार नाही ना दिला? मग कसली काळजी करतोस? आनंदात जग ना."

"ती नकार देईपर्यंत ना?" प्रणवने आमचे वाक्य पूर्ण केले.

"नाही रे. ती तुला होकार देणारच. प्रश्नकुंडलीने सांगितले आहे ना? की, ती तुझीच आहे म्हणून. मग असा उतावीळ होऊ नकोस. जरा संयमाने वाग. तिची रास वृश्चिक आहे. वृश्चिक राशीच्या मुली अशाच असतात, नवर्‍याला आपल्या तालावर नाचवणार्‍या. पण तेवढ्याच प्रेमळही असतात. "

"आता काय करू ते सांगा"

म्हटलं, " एक आयडीया देतो तुला. तुझ्या कॉलेजातली जी सर्वात देखणी मुलगी आहे ना, तिने तुला प्रपोज केलाय असं तिला सांग. just to expedite the matter. मग पटापट गोष्टी घडतील." सुदैवाने प्रणवला यातला जोक कळला नाहीतर एखादा खरचं करून बसायचा असलं काहीतरी.

तेवढ्यात नारायण कॉफी घेऊन आला. प्रणव म्हणाला, "पंत, ती कधी होकार देईल हे सांगता येईल का हो?"

आम्ही बँकेत जातांना बॅग घेऊन गेलो होतो. त्यामुळे पंचांग बरोबर होतेच.

प्रणवला म्हटलं, " आत्ता सांगतो"

तेवढ्यात "त्या कोपर्‍यातल्या" टेबलावर बसलेल्या दोघांचं काहीतरी बोलणं झालं आणि त्या मुलीने त्या मुलाला हसतहसत शेकहॅण्ड केला. आम्ही प्रणवला म्हटलं, " हा बघ शकुन"

प्रणव पुन्हा खळखळून हसला. म्हणाला, "होय, बरचं वाचलाय ब्लॉगवर"

म्हटलं, " शकुनावरून आठवलं. ही बघ एक नवीन गझल लिहिलेय. ती वाच. तो पर्यंत आम्ही रुलिंग प्लॅनेट्स काढतो. "

असे म्हणत आम्ही आमच्या गझलेचा प्रिंट आउट प्रणवकडे दिला. तो गझल वाचायला लागला आणि आम्ही पंचांगात डोके घातले.

काहीतरी फार महत्त्वाचे चालले आहे आणि ते आपल्याला कळलेच पाहिजे या हेतूने नारायण (वेटर) आमच्या बाजूला येऊन उभा राहिला. प्रणवला वाचायला दिलेली गझल अशी:-

सांग सखे तुज गीत म्हणू की आसुसलेली प्रीत म्हणू?
तुझ्या गोड लडिवाळ स्वरांना का न अता संगीत म्हणू?

हृदय गुंतले तुझ्यात सखये माझा हा अपराध नसे
सत्याचा स्वीकार कराया का "हो" आता भीत म्हणू?

एकाकीपण म्हणजे केवळ अंधःकाराचीच कथा
इंद्रधनू प्रीतीचे दिसले, जीवनास रंगीत म्हणू

असा गुंतलो तुझ्यामध्ये की तगमग होते तुझ्याविना
हार म्हणू ही मी माझी की, यास तुझी मी जीत म्हणू?

गोड शहारे फुलल्यावरती दूर राहणे नसे बरे
यास म्हणू मी लज्जा की ही तुझी आगळी रीत म्हणू?

"अजून कुठला हवा 'अगस्ती' प्रीतीसाठी शकुन तुला?"
"तळहाताच्या रेषा जुळल्या, हेच खरे भाकीत म्हणू"

रचनाकाल - दिनांक १० जून २००९

प्रणव गझल वाचेपर्यंत आम्ही रुलिंग प्लॅनेट्सची जुळवाजुळव केली. दिनांक १६ जून २००९ रोजी सकाळी ९.४२ वाजता रुलिंग प्लॅनेट्स खालीलप्रमाणे होते.

एल - कर्क- चंद्र (केतु)

एस - उत्तराभाद्रपदा- शनि (राहु)

आर - मीन - गुरू

डी - मंगळवार - मंगळ

आम्ही चंद्रभ्रमण पाहिले. प्रश्नवेळी चंद्र मीन राशीत आहे. रुलिंगमध्ये शनी आहे म्हणजे मेषेतले भ्रमण सोडावे लागेल.

पुढे चंद्र वृषभेत जाईल. ते भ्रमणही सोडावे लागेल. पुढे मिथुनेतले भ्रमणही सोडावे लागेल.

त्यानंतर चंद्र कर्केत जाईल. कर्केतील गुरू शनी रुलिंगमध्ये आहेत. म्हणजेच २४ आणि २५ जून रोजी घटना घडेल.

त्यातल्यात्यात शनि रुलिंगमध्ये बलवान असल्यामुळे २५ रोजीच घटना घडण्याची शक्यता आहे.

आम्ही प्रणवला सांगितले की, " २५ जूनला तिचा होकार येईल. त्या दिवशी तिला न चुकता भेट. नाहीतर नेमका कुठेतरी झक मारायला जाशील आणि "कोंबडी पळाली" म्हणण्याची वेळ येईल."

प्रणव हसला. पण ते हसणे जरा वेगळे होते हे आम्हाला जाणवले. आम्हाला माणसाच्या देहबोलीवरून बर्‍याच गोष्टी कळतात. असो.

डीपीमधून निघून घरी येऊन कामाला भिडलो आणि कामाच्या रगाड्यात त्या २५ तारखेच्या भाकीताचा विसर पडला.

आज दुपारी एकच्या सुमारास जेवायला बसलो असतांना एक फोन आला. फोनवरील व्यक्ती जवळजवळ ओरडलीच,

" पंत, you are great!!"

नंबर ओळखीचा नव्हता. कोण बोलताय ते सांगितलं नव्हतं. काही समजेना कुणाचा फोन आहे. आम्ही विचारले, " कोण बोलताय?"

"अहो कोण काय? आवाज नाही ओळखलात? प्रणव बोलतोय. अहो पंत, आज २५ जून आहे विसरलात काय आपलं डीपीमधलं बोलणं?"

आमची एकदम पेटली. म्हटलं, " अरे बोल. काय झालं? आणि तुझे नाव नाही आले कॉलर आयडीवर. कुठून बोलतो आहेस?"

"तिच्याच फोनवरून बोलतोय. आपलं सर्व परवाचं बोलणं *** ला सांगितलं. तुमचा नंबर तिला सेव्ह करायचा होता म्हणून तिच्याच फोनवरून केला तुम्हाला फोन. हा नंबर तुम्ही सेव्ह करून ठेवा *** म्हणून."

म्हटलं, " प्रणव, आता तिच्या मोबाईलवरून फोन करण्यापर्यंत मजल गेली म्हणजे तिने होकार दिला का? हा प्रश्न विचारणं मूर्खपणाचं आहे. तुम्हा दोघांना आमच्या शुभेच्छा. आनंदात रहा. "

प्रणवने "थ्यँक्यू थ्यँक्यू" म्हटले. तिलाही आमच्याशी बोलायचे होते. तिनेही फोनवर आमचे आभार मानले. आणि एक प्रश्न विचारला की,

"काय हो पंत, वृश्चिक राशीच्या मुली नवर्‍याला त्यांच्या तालावर नाचवतात हे तुम्ही प्रणवला म्हणालात ते कशावरून?"

म्हटलं, " तू एवढं तंगवलसं ना त्याला त्यावरून"

ती म्हणाली, " अहो पण त्याचा आज वाढदिवस आहे ना, म्हणून मला आजच त्याला होकार द्यायचा होता. Unique birthday gift. म्हणून मी थांबले होते इतके दिवस."

म्हटलं, " आम्ही प्रणवला हे ही सांगितलं होतं की वृश्चिक राशीच्या मुली प्रेमळही असतात."

ती हसली.

च्या मायला, म्हणून २५ जून तारिख सांगितल्यावर प्रणव वेगळ्या पद्धतीने हसला होता तर........

आम्ही पुन्हा प्रणवला फोन द्यायला तिला सांगितले आणि त्याला पुन्हा शुभेच्छा दिल्या

आनंदी सहजीवनाच्या आणि वाढदिवसाच्याही.....

आपला,
(शुभचिंतक) धोंडोपंत





Wednesday, June 24, 2009

भोगले जे दु:ख त्याला, सुख म्हणावे लागले....


लोकहो,

फेब्रुवारी २००८ मध्ये आमचे नारायणगाव, जिल्हा- पुणे येथील जातक श्री. थोरात हे त्यांच्या एका मित्रांना आमच्याकडे घेऊन आले होते. ते आल्यावर औपचारिक ओळख वगैरे झाली आणि त्यांच्या मित्रांनी त्यांच्या मुलीची पत्रिका आमच्यासमोर ठेवली.

पत्रिका हातात घेतल्यावर मिनिटभरात घटस्फोटाचा प्रश्न आहे हे आमच्या लक्षात आले. ते काही बोलायच्या आधी आम्हीच त्यांना विचारले की,
" काय, नांदत नाही का पोरगी सासरी?"
ते चमकले. म्हणाले, "होय तसचं आहे. कोर्टात केस टाकली होती, तो निकाल आला. आता दुसरी सोयरीक कधी ते विचारायला आलोय."

पत्रिका पाहिल्यावर जो प्रश्न विचारला जाऊ नये असे आम्हाला वाटत होते, तोच प्रश्न त्यांनी टाकला होता. अशा वेळेस फार पंचाईत होते.

प्रश्नवेळेस कुंडलीला शनीची महादशा सुरू आहे. (२७/०२/१९९१ ते २७/०२/२०१०) आणि गुरूची अंतर्दशा (१६/०८/२००७ ते २७/०२/२०१०)

शनी स्वतः लाभात असून तो चतुर्थेश आणि पंचमेश आहे. शनी केतूच्या नक्षत्रात केतू षष्ठात बुधाच्या नक्षत्रात. बुध लग्नात असून नवमेश आणि व्ययेश. केतु गुरूच्या राशीत गुरू नवमात तृतीयेश आणि षष्ठेश. गुरू राहुच्या नक्षत्रात आणि राहु व्ययात.

राहु चंद्राच्या नक्षत्रात चंद्र नवमात आणि दशमेश. राहु बुधाच्याच राशीत बुध लग्नात नवमेश आणि व्ययेश. बुध गुरूच्या नक्षत्रात गुरू नवमात तृतीयेश आणि षष्ठेश. म्हणजे महादशास्वामी शनीचे कार्येशत्व असे आहे:-

शनी ११/ ४, ५ केतू - /- बुध - १ / ९, १२ (शनिची दृष्टी १, ५, )
केतु राशीस्वामी गुरू - ९/ ३, राहु १२/- चंद्र ९/ १० ( गुरूची दृष्टी १, ३, ५)
राहु राशीस्वामी बुध १/ ९, १२ गुरू ९/ ३, (बुधाची दृष्टी ७)

हे कार्येशत्व पाहिल्यावर शनि महादशा संपेपर्यंत वैवाहिक सौख्याचा बोजवारा उडालेला असेल हे लक्षात आले. प्रश्नवेळी शनी महादशेतली शेवटची गुरूची अंतर्दशा सुरू होती. गुरू नवम आणि तृतीय स्थानाचा कार्येश असल्यामुळे त्याच्या अंतर्दशेत घटस्फोटाच्या केसचा निकाल लागला.

आम्ही सहज पुढचा महादशास्वामी बुध पाहिला आणि बुधसुद्धा त्याच्या महादशेत वैवाहिक सौख्य या मुलीला लाभू देणार नाही हे लक्षात आले.

आमची कुंडली पाहून झाल्यावर हे सर्व त्यांना कसे सांगावे हा विचार आम्ही करत असतांना ते गृहस्थ म्हणाले,

" आमच्या ओळखीतले एक स्थळ तिला सांगून आले आहे. मुलाची पत्रिका आत्ता आमच्याकडे नाहीये. पण मुलगा खूप चांगला आहे. स्वतःचा धंदा, शेती आहे. घरची परिस्थिती चांगली आहे. कुटुंब चांगल्या परिचयातले आहे. तिथे सोयरीक करावी असं मला आणि आमच्या मंडळींना वाटतयं. तर पोरगी सुखात नांदेल ना तिथं?"

या कुंडलीचा नवमांश द्वितीयेश गुरू आहे. गुरूने काय दिवे लावलेत आणि यापुढे लावेल हे त्याच्या कार्येशत्वावरून सहज लक्षात येईल. वैवाहिक सौख्याचा कारक ग्रह शुक्र स्वत: व्ययात, लग्नेश आणि अष्टमेश. त्यामुळे या मुलीला द्वितीय विवाहातूनही सुख मिळणार नाही हे आलेच.

आम्ही त्यांना म्हटले, " मुलीच्या विवाहाची घाई करू नका. किमान ही अंतर्दशा होईपर्यंत तरी वाट पहा. फेब्रुवारी २०१० नंतर पहा."

विजेचा धक्का बसावा तसे ते चपापले. म्हणाले, " अहो काहीतरी काय सांगताय. अजून दोन वर्ष पोरीला बिना लग्नाची घरात ठेवायची? तोवर तिचे वय ३२ वर्षे झालेले असेल."

" ते बरोबर आहे हो. पण आत्ताच घटस्फोट झालाय ना? त्याचा मानसिक ताण असतो. तो तर दूर होऊ दे."

हे सर्व सांगतांना आम्हालाच मानसिक ताण आला होता. पण ती मुलगी किमान गुरू अंतर्दशेत तरी बोहल्यावर चढू नये यासाठी आमची केविलवाणी धडपड चालली होती. पण त्यांना ती मंजूर नव्हती. त्यांना लवकरात लवकर तिचा विवाह उरकायचा होता. ते आमच्यावर काहीसे रागावलेही होते.

" तुम्ही काहीतरी भलतचं सांगता रावं. या साबाजीच्या नादाला लागून तुमच्याकडे आलो. लग्न केव्हा होईल हे विचारायला आलो तर तुम्ही म्हणता दोन वर्ष पोरीला तशीच ठेवा. आमच्या समाजात नाही चालत अशी बिनलग्नाची पोरगी घरात ठेवून. आम्ही इतर ज्योतिषांकडे पण जाऊन आलोय तुमच्याकडे येण्यापूर्वी. सर्वांनी सांगितलाय की सहा आठ महिन्यात तिचे लग्न होईल. व्यवस्थित संसार करेल. याची खात्री करून घ्यायला आलो तुमच्याकडे तर तुमचं काहीतरी उलटचं."

ते गृहस्थ काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांना आमच्याकडून भविष्य जाणून घ्यायचे नव्हते तर त्यांना त्यांच्या मुलीच्या वैवाहिक सौख्याची हमी हवी होती, जी आम्ही दिली नाही. कारण आम्ही शास्त्राशी प्रतारणा करून वाट्टेल ते कधीच सांगत नाही त्यामुळे त्यांना आमचा राग आला होता. अशा वेळेस त्यांना त्यांच्या नशिबावर सोडून द्यावं आणि आपण आपल्या कामाला लागावं हे उत्तम.

आम्ही त्यांना हात जोडून एवढेच म्हटले की,
" तुम्ही ज्या ज्योतिषांकडे जाऊन आला आहात त्यांचे भाकीत बरोबर येवो आणि आमचे चुको अशी स्वामींकडे प्रार्थना. ठीक आहे? या आता. शुभेच्छा."

ते जायला निघाले. थोरात काहीसे बावचळल्यासारखे झाले. त्यांचे मित्र चपला घालत असतांना थोरातांना आम्ही खुणेनेच "फोनवर बोलू" असे सांगितले.
तासाभरात थोरातांचा फोन आला. म्हणाले, "पंत, माफ करा. ते जरा गरम झाले. आम्हालाही कल्पना नव्हती ते असे काही करतील."

आम्ही म्हटले, " जाऊ दे हो. चालायचचं. एक करा जमलं तर. फेब्रुवारी २०१० पर्यंत मुलीचा विवाह होऊ देऊ नका. जर झाला तर तो टिकणार नाहीये हे नक्की. त्यांचा राग गेल्यावर त्यांना समजावण्याचा प्रयत्न करा. ऐकलं तर ठीक आहे नाहीतर त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या."

मार्च २००८ अखेरीस अहमदनगरला त्या मुलीचा द्वितीय विवाह त्या "चांगल्या" मुलाबरोबर झाला.
थोरातांनी ही बातमी दिली. त्यांच्या मित्रांनी स्वत: आम्हाला काहीही कळवले नाही.

गेल्या रविवारी सकाळी अचानक ते गृहस्थ आमच्या घरी आले. बेल वाजवून दारात उभे. म्हणाले,
"ओळखलंत का? मी *** . थोरातांबरोबर आलो होतो मुलीच्या लग्नाचं विचारायला दीड वर्षापूर्वी. "

म्हटलं, " या या. आणि थोरात कुठे आहेत?"

"ते गावाला गेलेत."

आम्ही त्यांना हॉलमध्ये बसवले. म्हटलं,

"आता तुम्ही काय काम काढलतं?"

"एक गोष्ट सांगायची होती तुम्हाला बरेच दिवस. अहो, तुम्ही म्हणाला होतात की ती कुठली दशा संपेपर्यंत मुलीचा विवाह करू नका. त्यावेळेस तुमचा खूप राग आला होता मला. महिन्याभरात तिचं लग्न त्या मुलाशी लावून दिलं. पण पोरगी दोन महिन्यात घरी परत आली हो माझी. तो ही संसार मोडला तिचा."
असे म्हणून ओक्साबोक्शी रडायला लागले.

त्या साठीच्या गृहस्थांना या पद्धतीने रडतांना पाहून आम्हीही सुन्न झालो. दादांची गझल आठवली.

भोगले जे दु:ख त्याला, सुख म्हणावे लागले
एवढे मी भोगले की, मज हसावे लागले

आपला,
(दु:खविलासी) धोंडोपंत