या संकेतस्थळाच्या सर्व वाचकांना धोंडोपंत आपटे यांचे मन:पूर्वक धन्यवाद.
या संकेतस्थळाला वाचकांनी उदंड प्रतिसाद दिला. मागच्या गौरी तृतीयेला आम्ही लेखन सुरू केले. पण तेव्हा गणक हा प्रकार आम्हाला माहित नव्हता. तो जून मध्ये येथे लावण्यात आला. डिसेंबर २००७ रोजी वाचकांच्या दहाहजार भेटी संकेतस्थळाला दिसत होत्या.
आजमितीस म्हणजे २४ मे रोजी ही संख्या चोवीस हजारावर गेली आहे. पंचवीस हजाराकडे वाटचाल सुरू आहे. हे सर्व वाचकांच्या प्रेमामुळे शक्य झाले.
गेल्या वर्षभरात शेकडो वाचकांशी परिचय आणि स्नेह जमला. शेकडो जणांच्या कुंडल्या आम्ही बघितल्या. त्यावर मार्गदर्शन केले. काय करावे आणि काय करू नये याबद्दल सूचना केल्या. अनेकांच्या अनेक समस्यांवर उपाय सांगितले.
आम्ही केलेल्या मार्गदर्शनाचा वाचकांना खूपच फायदा झाला. हे त्यांच्याशी झालेल्या पत्रव्यवहारातून स्पष्ट होते आहे. अनेक जण फोन करून किंवा गुगलटॉकवर संपर्क साधून, "पंत, तुम्ही अमूक अमूक सांगितलेत आणि तसे झाले हो" असे सांगतात तेव्हा आम्हाला खूप आनंद होतो.
कोणाचे जॉबसंबंधीचे त्रास , कोणाला परदेशगमन , कोणाला बढती, बदली, कोणाला कौटुंबिक असमाधान, कोणाचा अडलेला विवाह, कोणाचा विवाह होऊनही घटस्फोटापर्यंत मजल, कोणाला संतती होण्याबद्दल समस्या, कोणाचे नवरा-बायकोत वाद आणि विभक्तता, कोणाला आरोग्याच्या कटकटी, कोणाला मुलांच्या करिअरचे भेडसावणारे प्रश्न, अशा एक ना अनेक समस्यांवर आम्ही शास्त्रास अनुसरून मार्गदर्शन केले आणि करतो व लोकांच्या जीवनात मार्गदर्शनानुरूप बदल घडून आले हे पाहिल्यावर आम्ही धन्य होतो.
आपल्या मार्गदर्शनामुळे कुणाच्या जीवनात आनंद निर्माण होतो, ही बाब आम्हांदिकांसाठी निश्चित सुखावणारी आहे. कारण आमच्या लेखनाचा उद्देश हा ज्योतिषशास्त्राचा समाजाला उपयोग होणे, हा आहे.
आम्ही हे सर्व एका शुद्ध लोककल्याणाच्या भूमिकेतून केले आणि करीत आहोत. तुकारामांनी म्हटल्याप्रमाणे
शुद्ध बीजापोटी। फळे रसाळ गोमटी॥
आम्ही जे पेरीत गेलो त्याची रसाळ गोमटी फळे आज दिसत आहेत. याहून आनंदाचा क्षण नाही. जगातल्या बहुतेक सर्व भागातून जिथे जिथे मराठी माणूस आहे, तिथून हे लेखन वाचले जाते. जगातल्या बहुसंख्य प्रांतातून ज्योतिषमार्गदर्शनाबद्दल विचारणा होते. नवीन ओळखी होतात. स्नेह निर्माण होतो. माणसे जोडली जातात. अजून काय हवे आमच्यासारख्याला?
"पंत, अमेरिकेत कधी येताय? इथे आलात की तुमची सर्व सोय आम्ही करू".
"पंत इंग्लंडला चक्कर टाका. आम्ही आहोत इथे. इथे फक्त विमानतळावर उतरा. पुढची सर्व व्यवस्था आमच्यावर"
असे जिव्हाळ्याचे निरोप वाचकांकडून येतात तेव्हा बरं वाटतं.
कोकणातल्या एका खेड्यातल्या आमच्यासारख्या माणसाला जगाच्या विविध कानाकोपर्यातले लोक ओळखतात, नुसते ओळखत नाहीत तर त्यांचा कुटुंबीय मानतात याहून मोठी गोष्ट काय असू शकते?
वाचकहो, आजपर्यंत जे प्रेम आम्हांला दिलेत ते यापुढेही मिळत राहो ही श्री व्याडेश्वरचरणी प्रार्थना.
लोभ आहेच, तो वृद्धिंगत व्हावा ही अपेक्षा.
सर्व वाचकांना आमचा दंडवत.
आपला,
(नतमस्तक) धोंडोपंत
Saturday, May 24, 2008
वाचकांना धन्यवाद
Thursday, May 22, 2008
जीवनात ही घडी अशीच राहू दे....
लोकहो,
गेल्या नोव्हेंबर महिन्यात, म्हणजे नोव्हेंबर २००७ मध्ये
"आमच्या अनिताच्या विवाहाचा योग निश्चित कधी आहे? तिचे लग्न होणार आहे की नाही? नसेल तर तसे स्पष्ट सांगा",
असा प्रश्न आणि आदेश एका मुलीच्या पालकांनी आम्हाला दिला होता.
त्यांची काही चूक आहे असे आम्ही मानत नाही. कारण मुलीच्या लग्नाच्या काळजीत गेली पाच सहा वर्षे त्यांनी घालवली. २३ वर्षाची मुलगी असतांना तिच्यासाठी स्थळे बघायला सुरूवात केली होती. पण एकामागून एक लग्नाचे मोसम गेले तरी हिचा विवाह काही ठरला नाही.
मध्यतंरी एका ठिकाणी ठरतोय असे वाटले, पण आयत्या वेळेस त्या मुलाबद्दल काहीबाही माहिती मिळाली त्यामुळे हे पुढे गेले नाहीत. पुन्हा विवाहमंडळ, पुन्हा ज्योतिषी असल्या खेपा सुरू झाल्या.
सदर गृहस्थ त्यांच्या सौभाग्यवतींसोबत आमच्या चुलतबंधूंच्या सांगण्यावरून त्यांच्या मुलीची पत्रिका घेऊन आले. आल्याआल्या एका दमात वरील वाक्ये उच्चारली आणि पत्रिका आमच्यापुढे धरली. आम्ही कृष्णमूर्ती पद्धतीवरून हा प्रश्न सोडवावा असे मनाशी ठरविले कारण अचूक कालनिर्णयाची अपेक्षा या प्रश्नात होती. मुलीचे वय २९ झालेले. सूक्ष्मपणे सांगण्यासाठी आम्ही कृष्णमूर्ती पद्धत वापरतो.
आम्ही त्यांना बसावयास सांगितले, पाणी दिले आणि सांगितले की, " तुमच्या मुलीच्या विवाहाच्या योगाबद्दल तुमचे जे प्रश्न आहेत ते दोन प्रश्न आहेत. १) कु. अनिताचे लग्न होईल की नाही? २) जर होणार असेल तर कधी होईल? बरोबर?"
उभयतांनी होकारार्थी मान डोलावली.
आम्ही म्हटले," याप्रश्नांचे उत्तर देण्यासाठी आम्हांला कृष्णमूर्ती पद्धतीची कुंडली लागेल. ती कुंडली आम्ही आत्ताच आमच्या संगणकावर बनवतो. तो पर्यंत धीर धरा."
आम्ही त्यांना वर्तमानपत्र वाचावयास दिले पण ते वाचण्याचा त्यांचा मूड नसावा. कारण त्यांचे संपूर्ण लक्ष आमच्या संगणकावर होते.
दोन मिनिटात कुंडली तयार झाली. विश्लेषण करण्यापूर्वी आम्ही कुंडलीचे तपशील पुन्हा एकदा तपासतो. त्या प्रमाणे ती कुंडली पुन्हा तपासली.
कृष्णमूर्ती पद्धतीप्रमाणे, भावचलित कुंडलीतील सप्तमस्थानाचा उपनक्षत्रस्वामी जर दोन, सात किंवा अकरा या भावांपैकी किमान एका भावाचा बलवान कार्येश असेल तर आणि तरच विवाह होतो. तसेच तो एक सहा दहा आठ बारा या स्थांनाचाही कार्येश होत असेल तर वैवाहिक सौख्य विवाह होऊनही मिळत नाही.
कु. अनिताच्या कुंडलीत सप्तमभावाचा उपनक्षत्रस्वामी २ आणि ७ या भावांचा बलवान कार्येश होता आणि तो सप्तमेश असून सप्तमातच होता.
त्यामुळे कु. अनिताचे लग्न होणार हे नक्की. हे अगदी १००% खात्रीपूर्वक सांगू शकतो.
तसेच तो अष्टमस्थानाचाही कार्येश होता. त्यामुळे आधी ठरत आलेले लग्न आयत्यावेळेस मोडावे लागले होते व त्यातून मनस्ताप झाला होता.
त्याचप्रमाणे महादशा आणि अंतर्दशांचे स्वामीसुद्धा दोन, सात, अकरा या भावांचे कार्येश असतील तर त्या महादशेत आणि अंतर्दशेत विवाह होतो.
आता सुरू असलेल्या दशांचे महादशा व अंतर्दशा स्वामी चांगले मिळत होते. त्यामुळे यावर्षी विवाहयोग नक्की आहे, याबद्दल आमची खात्री झाली. त्याबद्दल सांगण्यासाठी त्यांच्याकडे वळलो.
आम्ही त्यांना सांगितले की, " गद्रेसाहेब, अनिताच्या कुंडलीत प्रबळ विवाहयोग आहे. त्यामुळे तिचे लग्न होणार हे नक्की".
एवढा वेळ गप्प बसलेल्या सौ. गद्रेबाईंना आमचे उद्गार ऐकून लगेच पालवी फुटली. संभाषणाची सूत्रे हाती घेण्यासाठी त्या पुढे सरसावल्या. त्यांनी नवर्याला हात दाखवून "गप्प बसण्याची" खूण केली आणि एखाद्या हवा गेलेल्या फुटबॉलसारखे गद्रेसाहेब फुऽऽऽस झाले. त्यावरून गद्रेसाहेबांना एकूण घरात काय किंमत आहे, याची कल्पना आम्हांला आली.
"पण धोंडोपंत, तुम्ही जे काही म्हणालात ते नीट खात्री करून सांगताय ना?" गद्रेबाई
" अहो म्हणजे काय? तुमचा विश्वास नाही की काय?" धोंडोपंत
"तसं नाही हो, पण काही चुकायला नको. आत्तापर्यंत अनेक ज्योतिषांनी सांगितले की या वर्षी होईल, या वर्षी होईल आणि असे करत करत आता हे सहावे वर्ष आहे अजूनही आमचा शोधच चालू आहे. तिच्या मैत्रीणींची दोन दोन बाळंतपण झाली त्या सहा वर्षाच्या कालावधीत". गद्रेबाई
"आम्ही असे म्हणतोय की अनिताचा विवाह होणार म्हणजे होणार. १००% होणारच". धोंडोपंत
"पण कधी? किती वर्षांनी? ते सांगा की पंत". गद्रेबाई.
आम्ही म्हटले, "त्यासाठीच आम्ही हिशोब करीत आहोत. जरा दोन मिनीटे शांत बसा." आम्ही महादशा अंतर्दशा स्वामींवरून आणि रवीच्या गोचर भ्रमणावरून विवाहाचा कालावधी काढला आणि कु. अनिताचा विवाह २००८ साली १५ एप्रिल ते २७ एप्रिल या कालावधीत होईल असे त्यांना सांगितले.
एवढे तारीखवार सांगितल्यावर त्या बाई म्हणाल्या,
"पंत, अनेक ज्योतिषांकडे आम्ही गेलो. प्रत्येक जण म्हणतो योग आहे. होईल होईल. पण तो योग कधी आहे हे कुणीच सांगत नाहीत. होईल होईल एवढेच सांगतात. आम्ही तर अनिताच्या लग्नाच्या समस्येने अगदी हवालदिल झालो आहोत. आमचेही वय आता मोठे आहे. पूर्वीसारखी दगदग झेपत नाही. मनानेही खचत चाललोय. आज तुम्ही एक आशेचा किरण दाखवलात. त्यावर पुढचे चार पाच महिने जगू."
दोन महिने झाले. त्यांच्याशी काही संपर्क झाला नाही. जानेवारीत ते एका मुलाची पत्रिका घेऊन आले. आम्ही पत्रिका जुळतेय हे सांगितले. तिथे अनिताला दाखवण्यात आले. दोघांचीही पसंती झाली.
नवर्यामुलाची अपेक्षा एवढीच की लग्नानंतर मुलीने घर सांभाळून मग करिअरचा विचार करावा. ती उभयतांना मान्य झाली. विवाह ठरला असे समजले. आनंद वाटला.
त्यानंतर मुहूर्त काढण्यासाठी ते येतील असे वाटले होते. पण ते आले नाहीत. आम्हालाही कळेना की ते मुहूर्तासाठी का आले नाहीत? आमच्या चुलतभावाकडे चौकशी केली तेव्हा ते मुलीच्या लग्नाच्या गडबडीत आहेत, असे उत्तर त्याने दिले.
मार्चमध्ये गद्रेसाहेब उभयता घरी आले. आल्याआल्या,
"पंत तुम्ही सांगितलेत तसेच झाले. अनिताचे लग्न २० एप्रिल रोजी करायचे ठरले आहे. मुहूर्तासाठी येणार होतो पण वरपक्षाच्या मंडळींनी सांगितले की त्यांचे गुरूजी मुहूर्त देतील तोच पाळायचा. त्यामुळे तुमच्याकडून मुहूर्त काढता आला नाही. त्याबद्दल क्षमस्व".
आम्ही म्हटले, " अहो त्यात काय एवढं? मुहूर्त कोणीही काढू शकतं. त्यात काही विशेष कौशल्याचा भाग नाही. खरा मुहूर्त तर आम्ही तुम्हाला आधीच काढून दिला होता. "
२० एप्रिल रोजी अनिताचा विवाह पार पडला. एवढे अचूक भविष्यकथन आणि कालनिर्णय ही गुरुवर्य कृष्णमूर्तींनी ज्योतिषशास्त्राला दिलेली फार मोठी देणगी आहे.
विविध पद्धतीतील चांगले घटक घेऊन भविष्यकथन करावे. त्याचा जातकाला खूप फायदा होतो. पारंपारिक पद्धतीत काही ज्योतिषतत्वे अशी आहेत ज्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. पारंपारिक ग्रंथातून काही योग असे दिले आहेत की तो एक योग दिसला की संपूर्ण पत्रिकेचे आकलन होते. "त वरून तपेलं" असं आपण म्हणतो. तद्वत पारंपारिक पद्धतीतील ही रत्ने आहेत. त्याबद्दलही या ब्लॉगावर लिहायचा विचार आहे.
आज आवराआवर करतांना अनिताच्या विवाहाची आमंत्रण पत्रिका मिळाली, म्हणून म्हटले लिहू त्याबद्दल.
आपला,
(सूक्ष्मदर्शी) धोंडोपंत
Saturday, May 17, 2008
ग्रहांचे शुभाशुभत्व
लोकहो,
कुंडलीतील ग्रह त्यांच्या दशा महादशेत महत्वाची फळे जीवनात देतात. पण काही ग्रहांबद्दल नको ते (गैर)समज समाजात आहेत. शनी म्हणजे वाईटच, मंगळ म्हणजे भांडणतंटा वगैरे वगैरे. सर्व यादी इथे विस्तारभयास्तव देत नाही.
असाच एक गोड गैरसमज आहे की, गुरू म्हणजे केवळ शुभ. शनी मंगळाला नाके मुरडणारे लोक गुरूपुढे सुखावतात. गुरू हा सर्वात शुभग्रह आहे, असे पारंपारिक ज्योतिषांनी समाजमनावर इतके ठसविले आहे की, गुरुची नकारात्मक फले मिळतात यावर सहजासहजी कोणी विश्वास ठेवणार नाही.
कर्केचा गुरू म्हटला म्हणजे तर तो राजयोगकारक आहे, अमूक आहे, तमूक आहे या गोष्टी समाजात इतक्या खोलवर रुजलेल्या आहेत की एखाद्याला गुरूमहादशेत गुरूचे वाईट फल मिळेल हे सांगितले तर तो वाद घालायला प्रवृत्त होतो.
दोष जातकाचा नाही. तर तो ज्या "विद्वान"(?) ज्योतिषांकडे जाऊन आलेला असतो, त्यांनी त्याचे तसे conditioning केलेले असते.
त्यामुळे, " शनी तुला चांगले फल देईल आणि गुरू वाईट देईल", असे कुणाला सांगितले तर प्रथमदर्शनी ते त्याला पटत नाही.
त्या म्हणण्यामागचा शास्त्रीय कार्यकारणभाव समजून त्याचे प्रबोधन होईपर्यंत, तो त्याच जुनाट मताला चिकटून असतो. एकदा त्याला कार्यकारणभाव कळला, की तो नीट विचार करून ती गोष्ट स्विकारतो.
कोणताही ग्रह ज्या स्थानात असतो त्याची फळे कमी प्रतीची देतो. तो सर्वात जास्त जोरदारफले त्या स्थानांची देतो ज्यात त्याचा नक्षत्रस्वामी असतो आणि जिथे त्याच्या नक्षत्रस्वामींच्या राशी असतात.
गुरूवर्य कृष्णमूर्तींनी आयुष्यभर संशोधन करून जे मोलाचे सिद्धांत मांडले त्यातील हा अत्यंत महत्वाचा सिद्धांत आहे.
जर का एखादा ग्रह ६/८/१२ मध्ये असून त्याचा नक्षत्रस्वामी हा शुभ भावांचा कार्येश असेल तर तो ग्रह तथाकथित अशुभ स्थानात असूनही शुभ फले देईल. तसेच एखादा ग्रह अगदी केंद्रकोणात जरी असेल आणि त्याचा नक्षत्रस्वामी जर शुभस्थानांच्या व्ययभावांचा कार्येश असेल तर तो शुभस्थानात पडलेला ग्रहसुद्धा नकारात्मक फले देईल.
उदाहरणार्थ, तूळ लग्नाला कर्केचा गुरू दशमात येतो. अनेक पारंपारिक ज्योतिषी दशमातला कर्केचा गुरू पाहिल्यावर अगदी राजयोगासारखी फले सांगतात.
पण अनुभवाअंती असे आढळते की इतका श्रेष्ठ समजला गेलेला गुरू जर कर्केत आश्लेषा नक्षत्रात असेल तर तो माणसाला देशोधडीला लावायला कमी करत नाही. दशमात कर्केचा गुरू असलेल्या अनेकांच्या नोकर्या या काळात गेलेल्या आम्ही पाहिल्या आहेत. कारण आश्लेषा नक्षत्री असलेला कर्केचा गुरू, बुधाची फले देतो. तूळ लग्नाला बुध नवमेश आणि व्ययेश होतो. दशमात गुरू पुनर्वसू नक्षत्रात असेल तर चांगली फळे देईल. पण आश्लेषात तो वाईट फलेच देतो असा अनुभव येतो.
त्यामुळे ग्रहाचे शुभाशुभत्व नीट समजून घेऊन भविष्यकथन केले गेले पाहीजे. कर्केचा गुरू आणि मेषेचा रवी, मीनेचा शुक्र आणि कन्येचा बुध ही पोपटपंची वास्तवापासून दूर नेणारी आहे.
ग्रह कोणत्या स्थानांचा बलवान कार्येश आहे, दशास्वामी भुक्तिस्वामी कोणत्या स्थानाचे बलवान कार्येश आहेत याचा सखोल विचार केला पाहीजे आणि मग फले वर्तवली पाहिजेत, असे आमचे मत आहे.
आपला,
(नीरक्षीरविवेकी) धोंडोपंत
Friday, May 16, 2008
वाचादोषावर उपाय
लोकहो,
गेल्या आठवडाभरात तीन कुंडल्या अशा पाहिल्या की ज्या मुलांना जीभ जड असल्यामुळे नीट बोलता येत नाही. कुंडलीतील द्वितीय स्थान आणि बुध जर बिघडला असेल तर असे होते. यावर आधुनिक वैद्यकशास्त्रात स्पीच थरेपी पासून अनेक उपचार आहेत. ते जरूर करावेत. त्याचप्रमाणे आयुर्वेदातही उत्तम औषधे आहेत. त्याचाही लाभ घ्यावा.
पण येथे आम्ही एक अनुभवसिद्ध उपाय देत आहोत. ज्याचा हमखास गुण येतो असा अनेकांचा अनुभव आहे.
पिंपळाच्या पानावर चिक्कीचा गूळ लावून ते पान मुलांना चाटण्यास द्यावे.
त्यासाठी सर्वप्रथम-
पिंपळाचे जे पान घ्याल ते स्वच्छ धुतलेले असावे. नाहीतर त्यावरील जंतूंचा प्रादुर्भाव होईल.
पिंपळाचे पान तोडल्यावर त्यातून चीक येतो. तो जाऊ द्यावा. पान फार कोवळे किंवा फार जुने असू नये.
दुसरी गोष्ट म्हणजे पिंपळाचे पान केवळ चाटायचे आहे. ते मुलांना खायला देऊ नये. त्यावर लावलेला चिकट गूळच पोटात गेला पाहिजे. पान नव्हे. गूळ चाटून झाल्यावर पान फेकून द्यावे.
ज्या मुलांच्या वाचेमध्ये दोष आहे, अडखळत बोलतात, बोबडे बोलतात, तोतरेपणा आहे, काही अक्षरे उच्चारता येत नाहीत अशा पालकांनी हा उपाय करून पहावा. साधारण तीन चार महिन्यात लक्षणीय सुधारणा दिसून येईल.
आम्ही आमच्या कुळकर्णी नावाच्या स्नेह्यांना हा उपाय सांगितला होता. त्यांचा नातू साडेचार वर्षाचा झाला तरी त्याला नीट बोलता येत नव्हतं. एक एक अक्षर करत बोलायचा. हजारो रुपये स्पीच थरेपिस्टला देऊनही काही सुधारणा जाणवेना. त्यांनी हा उपाय करुन पाहिला. तीन महिन्यात नातू पोपटासारखा बोलायला लागला.
एक दिवस त्यांनी सांगितले की, "पंत, तुम्ही उपाय सांगितलात आणि त्याचा फारच चांगला उपयोग झाला."
आम्ही म्हटले, " उत्तम!"
त्यावर ते म्हणाले की, "आता दुसरी एक समस्या उद्भवली आहे.".
आम्हांला समजेना की आता नवीन काय झाले त्याला?
त्यावर त्यांनी खुलासा केला की, " तो इतका बोलतो की, आता शिव्याही द्यायला लागलाय."
आम्ही कपाळाला हात लावला.
आपला,
(खजील) धोंडोपंत
Thursday, May 15, 2008
रुलिंग प्लॅनेट्स भाग २
लोकहो,
मागील भागात रुलिंग प्लॅनेट्सची माहिती दिली. त्यात असा उल्लेख करून लेख संपविला की राहु-केतू, वक्री ग्रह यांच्यासाठी रुलिंग प्लॅनेट्स ठरविण्याचे नियम जरा वेगळे आहेत.
आपल्याला माहित आहेच की राहू आणि केतू हे ग्रह नाहीत. हे काल्पनिक बिंदू किंवा छायाग्रह आहेत. सूर्याचा भासमान भ्रमणमार्ग म्हणजे क्रांतीवृत्त चंद्राच्या विक्षेपवृत्ताला जिथे छेदते असे दिसते ते छेदनबिंदू म्हणजे राहू व केतू होत. रवी हा देखिल ग्रह नाही. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. असे असून सुद्धा त्याला ग्रह मानले आहे. याचे कारण ज्योतिष हे भूमध्य पद्धतीवर अवलंबून आहे. पृथ्वी हा मध्य कल्पून केलेले गणित असल्यामुळे सूर्य हा तारा असूनही त्याच्या भासमान भ्रमणामुळे त्याला ग्रह मानला आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरत असल्यामुळे पृथ्वीवरून पाहतांना सूर्य फिरतो असे दिसते. आपण गाडीतून जात असतांना रस्त्यावरील स्थिर झाडे मागे पडत आहेत असे दिसते. झाडांना गती नाही. गती गाडीला आहे. पण गाडीच्या वेगामुळे झाडे मागे सरत आहेत असे जाणवते.
कृष्णमूर्ती पद्धतीत राहू आणि केतू या दोन ग्रहांना फार महत्व आहे. गुरूवर्य कृष्णमूर्ती म्हणतात:- Nodes are stronger than planets.
राहू आणि केतू या ग्रहांना नक्षत्रे असली तरी स्वत:ची राशी नाही. ते ग्रह ज्या राशीत असतील त्या राशीचा स्वामी जर रुलिंगमध्ये असेल तर राहू व केतू रुलिंगमध्ये येतात. सध्या राहू मकरेत आहे आणि केतू कर्केत आहे. जेव्हा जेव्हा शनी आणि चंद्र हे रुलिंगमध्ये असतील तेव्हा तेव्हा राहू व केतू हे अनुक्रमे रूलिंगमध्ये येतील.
त्याचप्रमाणे जे ग्रह रुलिंगमध्ये असून वक्री आहेत किंवा रुलिंगमधील जे ग्रह वक्री ग्रहांच्या नक्षत्रात आहेत ते ग्रह रूलिंगमधून वगळावे असे श्री. कृष्णमूर्ती यांनी सांगितले आहे. कारण वक्री ग्रह हे त्यांच्या वक्रत्वाच्या कालावधीत कार्य करीत नाहीत.
काही विद्वानांच्या मते चालू असलेल्या लग्नाचा स्वामी सुद्धा रुलिंगमध्ये घ्यावा. पण यावर मतमतांतरे आहेत. स्वत: गुरूजींनी तसेच कृष्णमूर्ती पद्धतीच्या अन्य विद्वांनांनी लग्ननक्षत्र स्वामी रुलिंगमध्ये घ्यावा असे कोणतेही स्पष्ट संकेत दिलेले नाहीत.
तसेच रुलिंग प्लॅनेट्स मधील ग्रह जर वक्री किंवा वक्री ग्रहांच्या नक्षत्रात असतील तर रुलिंग प्लॅनेट्सच्या युतीतील इतर ग्रह (दिप्तांश ६ अंश), लग्नावर दृष्टी टाकणारे ग्रह यांचा अंतर्भाव रूलिंगमध्ये होतो.
रुलिंग प्लॅनेट्सचे अनेक फायदे आहेत. त्याकडे आता वळतो.
पहिली गोष्ट म्हणजे एखाद्या ठराविक वेळेस ग्रहबल अजमविण्याची ही अत्यंत साधी आणि सोपी पद्धती आहे. कालनिर्णयासाठी ही अत्यंत विश्वासार्ह आहे. एखादी घटना नेमकी केव्हा घडेल हे रुलिंग प्लॅनेट्सवरून सांगता येते.
या गोष्टीचा अत्यंत महत्वाचा फायदा म्हणजे, जन्मवेळेची शुद्धी. अनेकदा अनेक लोकांना त्यांची निश्चित जन्मवेळ माहीत नसते. जन्म सूर्य उगवतांना, किंवा संध्याकाळी गुरे परतण्याच्या वेळेला अशा प्रकारची माहिती त्यांच्याकडे असते. अशा वेळेस रुलिंग प्लॅनेट्सवरून त्यांची जन्मवेळ अगदी मिनिटांपर्यंत काढता येते.
दिवसभरात घडणार्या घटना, आठवडाभरात घडणार्या घटना, महिन्याभरात घडणार्या घटना, वर्षभरात घडणार्या घटना यांची भाकिते सूक्ष्मपणे करण्यात रुलिंग प्लॅनेट्स अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात.
रुलिंगमध्ये शनी आल्यास अपेक्षित घटना उशीरा घडते. त्या घटनेस नेहमीच्या कालावधीपेक्षा जास्त कालावधी लागतो. तसेच रुलिंगमध्ये बुध आल्यास ती घटना दोन तीन टप्प्यात घडते किंवा त्यासाठी दोन तीन वेळा प्रयत्न केल्यास यश येते. पहिल्या प्रयत्नात यश येत नाही.
या ब्लॉगचे वाचक श्री. गिरीश कांबळे यांची कुंडली तीन महिन्यापूर्वी पाहून आम्ही त्यांच्या परदेशगमनाचा योग सांगितला होता. आम्ही सांगितल्याप्रमाणे श्री. गिरीशरावांना एप्रिल महिन्यात संधी मिळाली आणि आज ते अमेरिकेत आहेत. तिथून आमचा ब्लॉग वाचत आहेत.
जेव्हा त्यांचा परदेशगमनाच्या कायदेशीर बाबींची पूर्तता व्हायची होती तेव्हा ते जरा चिंतेत होते. त्यांनी आमच्याशी संपर्क साधून, "पंत, अमूक अमूक दिवशी सव्वा आठ वाजता इंटरव्ह्यू आहे. जरा टेन्शन आहे. काय होईल?" असे विचारले.
आम्ही रुलिंग प्लॅनेट्स मांडून सांगितले की, "तुम्ही निश्चित अमेरिकेत जाल. फक्त इंटरव्हू सकाळी ९.०० च्या पुढे लांबून देऊ नका. बरोबर जातांना एक लाल रंगाची वस्तू न्या."
ते आज अमेरिकेत आहेत म्हणजे सर्व गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडल्या हे वेगळे सांगायला नको.
अशा प्रकारे अनेक गोष्टींचे मार्गदर्शन रुलिंग प्लॅनेट्समधून व कुंडलीवरून मिळत असते.
गुरूवर्य कृष्णमूर्ती याला "Divine Guidance" असे म्हणतात. तो सर्वांना मिळत असतोच. फक्त तो समजून घेण्याच्या जाणीवा अनेकांकडे नसतात. ज्योतिषशास्त्रात काय आहे ते समजून न घेता, केवळ फॅशन म्हणून त्याच्या नावाने शंख करीत बसणे हेच त्यांचे ध्येय असते. तसे केले म्हणजे आपण बुद्धीवादी असा त्यांच्या समज असतो.
सुज्ञांनी या "Divine Guidance" चा वापर करून आपले जीवन यशस्वी करावे. बाकी या शास्त्रावर ज्यांना भुंकायचे आहे त्यांना भुंकू दे.
आपला,
(लोकहितवादी) धोंडोपंत
Wednesday, May 14, 2008
रुलिंग प्लॅनेट्स- भाग १
लोकहो,
गेल्या अनेक दिवसांपासून काही वाचकांनी Ruling Plantes म्हणजे काय याबद्दलची माहिती आम्ही आमच्या संकेतस्थळावर लिहावी अशी विनंती पत्राद्वारे केली होती. आमची इच्छा असूनही, या ना त्या कारणाने, लिहिणे राहून गेले.
आज पुन्हा एका ताईंनी फोनवरून रुलिंग प्लॅनेट्स बद्दल लिहावे ही विनंती केली आणि "या वर्षभरात तरी आम्हांला ते वाचायला मिळेल काय?" म्हणून विचारले.
आम्ही त्यांना म्हटले, " थांबा... आत्ताचे रूलिंग प्लॅनेट्स पाहूनच या प्रश्नाचे उत्तर देतो" असे सांगितले आणि पंचांगावरून त्यावेळेचे रुलिंग प्लॅनेट्स काढले. रुलिंगमध्ये बुध दोनदा आल्याने एका टप्प्यात लेखन न होता, किमान दोन टप्प्यात रूलिंग प्लॅनेट बद्दल लिहिले जाईल, हे ही सांगितले.
रुलिंग प्लॅनेट्स ही आदरणीय गुरूजी सोतिधमान्नन, ज्योतिषमार्तंड श्री. के.एस. कृष्णमूर्ती यांनी ज्योतिषशास्त्राला दिलेली फार मोठी देणगी आहे. कृष्णमूर्ती गुरूजींनी त्यांच्यावर असलेल्या उच्चिष्ठ महागणपतीच्या कृपारूपी प्रेरणेतून ज्योतिषशास्त्राला जे नवे आयाम दिले, त्यात "रुलिंग प्लॅनेट थिअरी" हे अत्यंत महत्वपूर्ण योगदान आहे. आम्ही गुरूजींचे सदैव ऋणी आहोत. त्यांच्यासमोर नतमस्तक आहोत.
रुलिंग प्लॅनेट्स म्हणजे ठराविक वेळेला विश्वावर अत्याधिक अंमल करणारे ग्रह. ग्रहमालेतील सर्व ग्रह विश्वावर परिणाम करीत असले तरी काही ग्रह हे ठराविक वेळेस आत्यंतिक महत्वाचे परिणामकारक ग्रह असतात. इतर ग्रह त्यामानाने त्यावेळेस सुप्त असतात. तर रुलिंग प्लॅनेट्स हे त्यावेळेस अत्यंत प्रभावीपणे काम करीत असतात.
प्रश्नकुंडली बनवितांना रुलिंग प्लॅनेट्सचा फार उपयोग होतो. नव्हे ते आवश्यकच असतात. इतकेच नव्हे तर जन्मकुंडलीचा अभ्यास करतांनाही रुलिंग प्लॅनेटसची जोड घेतली तर आत्यंतिक अचूकता साधता येते असा आमचा स्वत:चा अनुभव आहे.
रुलिंग प्लॅनेट्स म्हणजे नक्की काय?
गुरुवर्य कृष्णमूर्ती त्यांच्या Horary Astrology या ग्रंथात म्हणतात की,
By ruling planets, it is meant that a particular moment is ruled by few plantes. That is , one is to note;-
1) the exact position of the zodiac which would be rising for that moment for that locality on that day
2) the name of the day
3) the constellation in which Moon will be passing
4) the sign in which Moon would be.
याचा अर्थ असा की -
रुलिंग प्लॅनेट्स म्हणजे:-
१) त्या वेळेस जे लग्न चालू असेल त्याचा अधिपती म्हणजे लग्नेश
२) चंद्र ज्या नक्षत्रात असेल त्या नक्षत्राचा स्वामी
३) चंद्र ज्या राशीत असेल त्या राशीचा स्वामी
४) त्या दिवशी जो वार असेल त्या वाराचा स्वामी
हे ग्रह त्या वेळेचे रुलिंग प्लॅनेट्स झाले. उदाहरणावरून आत्ताचे रुलिंग प्लॅनेट्स काढू.
आज दिनांक १४ मे २००८ आहे. मुंबई अक्षांशाला सकाळचे म्हणजे दुपारचे १२ वाजून ०५ मिनिटे झाली आहेत. आज बुधवार आहे. या क्षणी १२.४० पर्यंत कर्क लग्न सुरू आहे. चंद्र या क्षणी पूर्वाफाल्गुनी या शुक्राच्या नक्षत्रात आहे. तो दुपारी ०३ वाजून १२ मिनिटांपर्यंत पूर्वेत असणार आहे. चंद्र सध्या सिंह राशीत आहे. तो रात्री ०९ वाजून ३६ मिनिटांपर्यंत सिंहेत असणार आहे.
तर आत्ताचे रूलिंग प्लॅनेट्स असे आहेत.
१) उदित लग्नाचा स्वामी - कर्क लग्न सुरू असल्यामुळे -- चंद्र
२) चंद्र नक्षत्र पूर्वाफाल्गुनी - त्याचा स्वामी शुक्र
३) चंद्र राशी सिंह - त्याचा स्वामी रवी
४) आज वार बुधवार- त्याचा स्वामी बुध
५) चंद्र रुलिंगमध्ये आहे. त्याच्या राशीत केतू असल्यामुळे केतू सुद्धा रुलिंगमध्ये येईल
म्हणजे आत्ताचे रूलिंग प्लॅनेट्स हे चंद्र, केतू, शुक्र, रवी आणि बुध हे आहेत. या ग्रहांचा आत्यंतिक प्रभाव सध्या सुरू असलेल्या वेळेवर आहे. जसजसे लग्न बदलेल, चंद्राचे नक्षत्र, रास बदलेल, वार बदलेल तसे हे रुलिंग प्लॅनेट्सही बदलणार आहेत.
रुलिंग प्लॅनेट्सचे अजूनही नियम आहेत. राहू केतू, वक्री ग्रह, वक्री ग्रहांच्या नक्षत्रातील ग्रह, लग्नावर दृष्टी टाकणारे ग्रह, युतीयोग याबाबत रुलिंग प्लॅनेट्सच्या संबंधी विवेचन पुढील भागात करू.
आपला,
(पारखी) धोंडोपंत
Sunday, May 11, 2008
शनी मंगळ युती
लोकहो,
ज्योतिष्यातील अत्यंत वाईट समजल्या गेलेल्या शनी मंगळ युतीवर आम्ही आज भाष्य करीत आहोत.
ही युती दिनांक २१ जून रोजी होणार आहे. युतीचे दिप्तांश १० अंश आहेत. म्हणजे मंगळ हा शनीजवळ १० अंश आल्यापासून ते शनीपासून १० अंश जाईपर्यंत या युतीचे परिणाम जाणवतील.
दिनांक २१ जून रोजी मंगळ कर्केत २९ अंश ४३ कलांवर असेल व त्या दिवशी शनी सिंहेत ०९ अंश ४२ कलांवर असेल. त्या दिवसापासून ही युती सुरु होईल. दिनांक १० जुलै रोजी ही युती एका अंशात म्हणजे अंशात्मक असेल. त्यानंतर मंगळ पुढे निघून जाईल व दिनांक ३१ जुलै रोजी ही युती पूर्णपणे तुटेल.
Mars- Saturn conjunction हा सर्व पद्धतीच्या ज्योतिर्विदांनी एक जबरदस्त कुयोग मानलेला आहे. अत्यंत वाईट फळे देणारी ही युती आहे. या फळात मोठे अपघात, ज्यात अनेक माणसे मृत्युमुखी पडतात अशी नैसर्गिक अरिष्टे, वादळे, घातपाती कारवाया, रक्तपात, दहशतवाद, इमारती कोसळणे, बॉम्बस्फोट, भूकंप, मोठमोठ्या आगी, रसायन आणि वायुगळती अशा प्रकारची फळे मिळतात.
तसेच व्यक्तिगत पातळीवर कुंडलीत ज्या स्थानात ही युती पडते, त्या स्थानाने दर्शविलेल्या बाबतीत एखादे जबरदस्त अशुभ फळ मिळते.
सध्या कर्क, सिंह आणि कन्या या राशी साडेसातीत आहेत. त्या राशीच्या लोकांनी फार सावध रहावे. खरे तर सर्वांनीच सतर्क रहावे.
मागील वेळी जेव्हा ही युती झाली होती तो दिवस अजूनही आम्ही विसरलेलो नाही. तेव्हा गुरूपौर्णिमेच्या दिवशी मुंबईमध्ये लोकल गाड्यात बॉम्बस्फोट झाले होते. १२ जुलै २००६.
त्या दिवशी गुरूपौर्णिमा होती. आम्ही गुहागरला होतो. दुपारी गुहागरहून गुरूपौर्णिमेनिमीत्त चिपळूणला आलो. आमच्या गुरूंच्या घरी दूरदर्शनच्या बातम्या लावल्या तेव्हा त्या भीषण बॉम्बस्फोटाची दृष्ये पाहून हबकलो.
जसजसा मंगळ शनीच्या जवळ येतो तसतसा वातावरणात फरक पडतो. ब्रह्मदेशात येऊ घातलेले चक्रीवादळ याचीच सूचना देते आहे काय?
या दिवसांत सर्वांनी सतर्क आणि सावध रहावे. कोणताही अनुचित प्रकार दिसल्यास किंवा कोणी संशयास्पद रितीने वावरतांना दिसल्यास संबंधित शासकीय अधिकार्यांना त्याची त्वरीत सूचना द्यावी. अफवांवर विश्वास ठेऊ नये. रात्रीचे प्रवास शक्य असल्यास टाळावेत. रेल्वे स्थानके, बस स्थानके, सार्वजनिक ठिकाणे, उद्याने, बगीचे, चित्रपटगृहे येथे वावरतांना आजूबाजूस बारीक लक्ष ठेवावे व जबाबदार नागरिकाचे कर्तव्य पार पाडावे.
आपला,
(सावध) धोंडोपंत
Wednesday, May 7, 2008
शनी मंगळ युती
लोकहो,
जून महिन्यातील तिसर्या आठवड्यात शनि-मंगळ युति हा ज्योतिष्यातील अत्यंत मोठा कुयोग येत आहे. गेले काही दिवस अनेक वाचक बंधू भगिनींनी आम्ही त्याबद्दल लिहावे असा आग्रह करणारी पत्रे पाठवली.
त्या सर्वांना हेच सांगणे की आम्ही याबद्दल लिहिणार आहोतच. नुकतीच अमावास्या होऊन गेली असल्यामुळे काम बरेच आहे. अमावास्येच्या तीन दिवसात आम्ही कोणाचीही पत्रिका बघत किंवा बनवत नाही. परिणामी त्यापुढील आठवड्यात ते साचलेले काम पूर्ण करावे लागते. त्यामुळे सध्या "रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग" अशी आमची परिस्थिती आहे.
शनी मंगळ युती हा मोठा कुयोग असल्याम